*सोलापूरच्या उद्योग वाढीसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स कटिबद्ध – ललितभाई गांधी*
_सोलापूरच्या औद्योगिक विकासाच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला सोलापूर विकास मंचच्या वतीने सादर करण्यात आलेले निवेदन_

*सोलापूरच्या उद्योग वाढीसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स कटिबद्ध – ललितभाई गांधी*
_सोलापूरच्या औद्योगिक विकासाच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला सोलापूर विकास मंचच्या वतीने सादर करण्यात आलेले निवेदन_
सोलापूरच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण मागण्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललितभाई गांधी यांच्याकडे सोलापूर विकास मंचच्या वतीने सादर करण्यात आल्या आहेत. या निवेदनात सोलापूरच्या औद्योगिक उन्नतीसाठी काही ठळक मुद्दे मांडण्यात आले आहेत.

मॅग्नेटिक महाराष्ट्र १.० आणि २.० या योजनांमध्ये सोलापूरला संधी दिली गेली नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने हजारो कोटींचे MoUs केले असले, तरी त्यात सोलापूरला वगळण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र उद्योग मंत्र्यांशी समन्वय साधून सोलापूरमध्ये अधिक गुंतवणूक आणि उद्योगांची उभारणी होण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दोन उड्डाणपूलांच्या मागणीचा उल्लेख करण्यात आला आहे. या पूलांची निर्मिती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सोलापूरचे सुपुत्र वालचंद हिराचंद दोशी यांना भारतरत्न सन्मान देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्याची मागणीही करण्यात आली आहे. शेठ वालचंद यांनी भारताच्या औद्योगिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले असून त्यांना भारतरत्न सन्मान मिळावा, अशी सोलापूरकरांची मागणी आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कराचे दर हे लहान आणि मध्यम व्यवसायिकांसाठी मोठी अडचण ठरत आहेत. त्यामुळे या करांमध्ये सूट देण्याची मागणीही या निवेदनात समाविष्ट करण्यात आली आहे.

‘मावा, मटका आणि मिरवणूक’ यांवर बंदी घालण्याची मागणी सोलापूरकरांनी केली असून चेंबरने हा मुद्दा सरकार दरबारी नेण्याची अपेक्षा आहे. तसेच, सोलापूरमधील उद्योगपती आणि उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने विशेष प्रयत्न करावेत, अशी विनंतीही सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आली.

सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने आवश्यक पावले उचलून सोलापूरकरांच्या मागण्यांचे निराकरण करावे, अशी अपेक्षा या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने आयोजित बैठकीत सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, मिलिंद भोसले, अॅड दत्तात्रय अंबुरे, विजय कुंदन जाधव, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष डि.राम रेड्डी, कोठारी उद्योग समूहाचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजु राठी तथा सोलापूरातील विविध औद्योगिक आणि व्यापारी असोसिएशनचे संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
