*नरसीतील गुरु रविदास मंदिर प्रेरणा केंद्र हे बहुजन समाजासाठी प्रेरणादायी ठरेल !*
गुरु रविदास जयंतीत इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची अपेक्षा
नरसी (प्रतिनिधि) : नांदेड जिल्ह्य़ातील नायगांव तालुक्यातील नरसी येथील गुरु रविदास मंदिर प्रेरणा केंद्र हे बहुजन समाजासाठी प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा येथे आयोजित गुरु रविदास जयंती महोत्सवात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी व्यक्त केली.
गुरु रविदास मंदिर प्रेरणा केंद्र नरसी येथे आयोजित गुरु रविदासांच्या ६२७ व्या जयंती महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे बोलत होते. नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण पा. भिलवंडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, आमची लढाई आता केवळ प्रतिनिधित्वाची नसून सर्व प्रकारच्या सत्तेतील संपूर्ण सहभागाची आहे.
भारतीय संविधानानुसार आम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे देशाच्या सर्व क्षेत्रात आम्हाला थोड्याबहूत प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले आहे पण मूळ प्रवाहापासून आम्ही व आमचा समाज आजही वंचित राहिला आहे. संधीची समानता असली तरी शासन प्रशासन आमच्या बाबतीत उदासीन आहे. जातीच्या आधारावर भेदभाव करुन शासन आम्हाला सुलभ कर्ज सुविधा देखिल उपलब्ध करुन देत नाही. त्यासाठी जाचक अटींचा सामना करावा लागत आहे. विशिष्ट समाजाला झुकते माप तर मागासवर्गीय समाजाला असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. केवळ प्रतिनिधित्व म्हणजे समाजाचा सर्वांगीण विकास नसून देशातील सर्व प्रकारच्या सत्तेत समाजाचा प्रत्यक्ष सहभाग वाढला पाहिजे.
अशा प्रकारच्या सर्व अन्याय अत्याचाराविरुद्ध संघर्ष करण्यासाठी समाजाची एकजूट असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपले सामाजिक संघटन मजबूत करणे ही काळाची गरज आहे. कोणतेही मंडळ किंवा समिती रस्त्यावर येऊन आमच्यासाठी संघर्ष करु शकणार नाही. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद हे लढाऊ संघटन असून ते कमजोर करण्याचे षडयंत्र हाणून पाडावे व गावोगावी या सामाजिक संघटनेच्या शाखा काढाव्यात असा संकल्प गुरु रविदास जयंतीनिमित्ताने करावा असे आवाहन शेवटी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
सुप्रसिद्ध हिंदी कवी मधू बावलकर (आदिलाबाद) यांनीही यावेळेस मुख्य मार्गदर्शन केले. रविदास, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ, कांशीरामजी यांनी आम्हाला स्वाभिमान शिकविला असून त्या विचाराचे आचरण करुन आपण शिक्षित व संघटित झाले पाहिजे असे आवाहन मधू बावलकर यांनी यावेळी केले.
ज्येष्ठ सामाजिक नेते व्यंकटराव दुधंबे यांनी नरसी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या गुरु रविदास मंदिर प्रेरणा केंद्रात आपण लवकरच गुरु रविदास मूर्तीची स्वखर्चाने स्थापना करण्याची ग्वाही दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज नरवाडे, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद जोगदंड यांनीही यावेळी आपले विचार मांडले.
मंचावर यावेळी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे कर्मचारी जिल्हाध्यक्ष भीमराव वाघमारे, जिल्हा संघटक दिगांबर जमदाडे, लातूर जिल्हा प्रभारी गणेश कांबळे, सरपंच गजानन भिलवंडे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद वाघमारे, लक्ष्मण कांबळे, शिवराज कांबळे, सुदाम उतकर आदींची उपस्थिती होती.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा जयंती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर गंगासागरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर जिल्हा महासचिव प्रकाश कामळजकर यांनी शेवटी आभार मानले. मा. खा. प्रतापराव पा. चिखलीकर यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण यावेळेस श्रावण पा. भिलवंडे आणि इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या आहे त्या जागेचा विस्तार करुन या ठिकाणी भविष्यात भव्य सभामंडप निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून आणखी निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन श्रावण पा. भिलवंडे यांनी अध्यक्षीय समारोपाच्या भाषणातून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष गंगाधर गंगासागरे, तालुकाध्यक्ष माधव गंगासागरे तसेच हणमंत गंगासागरे, गंगाधर दुडकीकर, संतोष कांबळे, व्यंकट गंगासागरे, सुरेश कांबळे, शैलेश गंगासागरे, आनंद बरबडे, ज्ञानेश्वर गंगासागरे, अशोक गंगासागरे, बालाजी बरबडे, चंद्रकला गंगासागरे, शशीकला कांबळे आदींनी परिश्रम घेतले. सहभोजनानंतर कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!