
“बलुतेदारी पध्दत काल बाह्य” सुतार व्यवसाय अडचणीत
ग्रामीण परिसरात काही वर्षांपासून शेती साहित्यासाठी शेतकरी सुतारांकडे धाव घेत होते. मात्र, आता लाकडी अवजारांऐवजी रेडिमेड मिळणारी लोखंडी अवजारे उपलब्ध झाल्याने सुतारांचा व्यवसाय अडचणीत आला. ग्रामीण भागातील बलुतेदारी पद्धत कालबाह्य, तर रेडिमेड साहित्याकडे कल वाढला आहे.
सुताराने बनवलेल्या अवजारापासून मिळालेल्या मिळकतीतून आपल्या कुटुंबीयांची गरज भागवित असे, परंतु आता लोखंड व प्लास्टिकपासून बनविलेली शेतीची अवजारे बाजारात उपलब्ध झाली आहेत. ही अवजारे थोडी महाग असली तरी टिकाऊ असल्याने शेतकरी रेडिमेड अवजारांकडे आकर्षित झाला आहे. यामध्ये बैलगाडी, तिफन, औत शहरात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे एकेकाळी महत्त्वाचा मानला गेलेला सुतार व्यवसाय करणाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली आहे. सुतार कुटुंबीयांचे संपूर्ण जीवन त्यांच्या कलाकौशल्यातून घडविलेल्या विविध लाकडी वस्तूंच्या मिळकतीतून घडविले जात असे. शेतीसाठी लागणारे नांगर, फन, गाडी, ज्यू, तिफण, रुमने आदी अवजारे, तर घरगुती साहित्यांत पलंग, टेबल, खुर्ची, पाट, घराचे छप्पर ठोकणे, आदी वस्तू तयार करत असे. घरगुती साहित्य बनविण्यासाठी किंवा त्यांची दुरुस्ती करण्याची शेतकरी सुताराकडे तासन तास जाऊन बसत. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.
पारंपरिक व्यवसाय संकटात
बारा बलुतेदारांमध्ये सुतार समाज हा महत्त्वाचा घटक मानला जातो. राज्यातील प्रत्येक गावा-गावांत सुतार समाजाचे आस्तित्त्व आहे. सुतार समाज म्हटले की, लाकडाचे काम करणारे कारागीर आपल्या नजरेसमोर येतात. शहरीकरणाचा सर्वाधिक फटका सुतार समाजाला बसला. घर बांधकाम असो की अन्य फर्निचर कामे असो यात काळानुसार मोठे बदल झाले आणि सुतार समाजाचा हा पारंपरिक व्यवसाय संकटात सापडला. लाकडी कामाच्या व्यवसायाला ग्रहण लागल्याने प्रामुख्याने सुतार समाजाने शहराकडे धाव घेतली.
ग्रामीण भागात बिकट स्थिती
सुतार समाज हा गावखेड्यात शेतकऱ्यांना शेती विषयक अवजारे बनवून देण्यासोबतच इतरही काम करतो. आणि त्यांच्या बदल्यात तो शेतकऱ्यांकडून धान्य घेतो किंवा काही लोक त्या बदल्यात पैसे देतात आणि त्यावर ते आपला उदरनिर्वाह करतात. हातावर पोट असणाऱ्या सुतार समाजाचा फर्निचर व इतर दैनंदिन लाकूडकाम हा व्यवसायही बंद असल्याने हा वर्ग अडचणीत सापडला आहे. आज जवळपास ८० टक्के समाज अजूनही कारागिरी व लाकडी फर्निचरचेच काम करत आहे. आता आधुनिक यंत्रांनी पारंपारिक काम करणाऱ्यांची जागा घेतली. खेड्यापाड्यातील सुतारकाम करणा ऱ्यांची स्थिती तर आणखीन बिकट झाली आहे.
फोटो-संग्रहीत