नुकताच युपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला. देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्व पणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली. कुणी IAS तर कुणी IPS तर कुणी इतर पदे मेरिटनुसार पटकावली. यातच बिरदेव डोणे 551 व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि IPS पदाला त्याने गवसणी घातली.बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा.जात्याच हुशार पण घरची परिस्थिती नाजूक. जळोची (बारामती) गावातील *डाॅ राजेंद्र चोपडे* यांचा पुतण्या प्रांजल चोपडे हे coep ला दोन वर्षे ज्युनिअर, सिव्हिल इंजिनिअरिंग चा विद्यार्थी. मुले बिरदेव ची चेष्टा करायची. प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहूनच ओळखले, हा आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीचा असणार, आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्रीच झाली. बिरदेव ला ही पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटलं ह्याचं हायसं वाटलं. सिनिअर्स चा त्रास कमी होण्यासाठी बिरदेव प्रांजल यांना चिकटून राहू लागला. दोघांची चांगली गट्टी झाली. प्रांजल यांनी इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. पुढे बिरदेव ही सिव्हिल इंजिनिअर झाला आणि त्यानेही स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जाण्याचे ठरवले. नोकरीच्या मागे न लागता बिरदेव ह्या परीक्षेच्या बेभरवशी आणि खडतर मार्गावरून चालू लागला.या कठीण प्रवासात सीओई पी मध्येच शिकणाऱ्या अक्षय सोलनकर याचीही बिरदेव ला वेळोवेळी सगळ्या प्रकारची मदत झाली.प्रांजल चोपडे हे दोन वर्षांपूर्वी UPSC अंतर्गत फॉरेस्ट ऑफीसर म्हणुन सिलेक्ट झाले. बिरदेव चा यशाचा शोध चालूच होता. तो आज संपला. आज दुपारी युपीएससी चा निकाल आला. प्रांजल चोपडे यांनी यादीत बिरदेव चे नाव शोधले. 551 व्या क्रमांकावर बिरदेव चे नाव दिसल्यावर बिरदेव ला बातमी देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी फोन लावला. तर बिरदेव भर उन्हात मेंढरे चरायला घेउन माळावर गेलेला. तू का मेंढरे घेउन गेलास विचारले असता वडील आजारी असल्याने मीच सध्या मेंढरे घेउन जातोय, बिरदेव उत्तरला. बिरदेव च्या वडिलांचे किडनी च्या मुतखड्याचे ऑपरेशन दोन महिन्यापूर्वी झालेले. पैशाची ओढाताण असल्याने बिरदेव ने प्रशिक्षण चालू असलेल्या प्रांजल आणि दुसरा कोल्हापूर चाच मित्र आशिष पाटील (IAS) या दोघांना मदतीसाठी फोन केला होता. आशिषची कोल्हापूरचा असल्यामुळे त्याच्या ओळखीने तेथील खाजगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ऑपरेशन ची सोय केली होती. ऑपरेशन झाले पण काहीतरी complication झाले (बिरदेव च्या भाषेत ऑपरेशन बिघडले). तर वडील आजारी असल्याने आमचा हा आय पी एस निकाल लागला त्यादिवशी त्यामुळे मेंढरे घेउन माळावर चारत होता. असा हा बिरदेव चा आय पी एस पर्यंतचा प्रवास. जाता जाता बिरदेव चा एक किस्सा सांगितला पाहिजे. दुष्काळात तेरावा महिना तसा बिरदेव चा मोबाईल काही दिवसांपूर्वी पुण्यात हरवला. बिरदेव पोलीस तक्रार द्यावी म्हणून पोलिसात गेला. पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली. बिरदेव ने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्रांच्या मदतीने पोलीस तक्रार नोंदवली. तक्रार घ्यायलाच टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तक्रार घेतली पण अजून फोन काही सापडला नाही. बिरदेव अधूनमधून फोन सापडला का विचारायला पोलीस स्टेशनला जात होता, तेव्हा तपास चालू आहे, सापडला की कळवू हे ठराविक साच्याचे उत्तर बिरदेव ला मिळत होते. हाच बिरदेव आज भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेला आहे. स्वतः भोगलेल्या हालअपेष्टा आणि उपेक्षा आणि उपसलेले कष्ट यांची जाणीव ठेऊन तो देशसेवा करेल याबाबत मनात तीळमात्र शंका नाही.