ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरावर ९ जून रोजी पुण्यात महत्त्वपूर्ण चर्चासत्र
पुणे, — ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण चर्चासत्र सोमवार, ९ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
या चर्चासत्राचे आयोजन अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती; वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे; महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित आणि वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांनी संयुक्तपणे केले आहे.
या चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ नेते व माजी कृषिमंत्री मा. शरद पवार यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, सहकार मंत्री मा. बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री मा. मानिकराव कोकाटे यांचीही उपस्थिती असणार आहे.
तसेच नेशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष मा.पी.आर.पाटील आणि अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त मा. प्रतापराव पवार यांच्यासह विविध साखर कारखाने व बँकाचे पदाधिकारी, तज्ज्ञ व शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.
शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदा
या चर्चासत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ऊस पिकाचे व्यवस्थापन, सिंचन नियोजन, हवामान अंदाज, कीड नियंत्रण, खत वापर, उत्पादन खर्च यामध्ये सुधारणा करून उत्पादनात वाढ कशी साधता येईल यावर चर्चा होणार आहे. AI च्या वापरामुळे शेतकऱ्यांना वेळेवर अचूक सल्ला मिळेल, त्यामुळे उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ होणे शक्य होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार तंत्रज्ञान
ही तंत्रज्ञान प्रणाली ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकारी संस्था, साखर कारखाने आणि वित्तीय संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम व अचूक माहिती प्रणाली विकसित केली जाणार आहे.
या चर्चासत्रातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नवी दिशा मिळेल आणि सहकार क्षेत्राच्या डिजिटलीकरणात महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.