गावगाथा

भावा’चा मोठेपणा! शेती वाटणीत दहिफळे कुटुंबाचा आदर्श निर्णय – नातं जपलं, मन जिंकलं

न्यायालयीन लढाया थांबवा, प्रेमाने वाटणी करा

 


✦ ‘भावा’चा मोठेपणा! शेती वाटणीत दहिफळे कुटुंबाचा आदर्श निर्णय – नातं जपलं, मन जिंकलं ✦

गंगाखेड, जि. परभणी
आजच्या काळात शेतवाटणीमुळे घरफोड, नात्यात वादविवाद आणि न्यायालयीन खटले सामान्य झाले आहेत. मात्र, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खादगाव या छोट्याशा गावात दहिफळे कुटुंबाने शेतजमिनीच्या वाटणीत नात्याचा, समंजसपणाचा आणि माणुसकीचा मोठा आदर्श घालून दिला आहे. भावांमधील निस्वार्थी प्रेम, आईवडिलांचा मान राखण्याची भावना आणि महिलांचा समंजस पाठिंबा यामुळे ही वाटणी गावकऱ्यांनाही एक शिकवण देऊन गेली आहे.

वडिलांच्या इच्छेखातर भावांनी घेतला निर्णय

खादगाव येथील रंगनाथराव दहिफळे यांचे कुटुंब हे गावातील प्रतिष्ठित व एकत्रित राहणारे कुटुंब म्हणून ओळखले जाते. वयोवृद्ध रंगनाथराव (वय ९१) यांनी आपल्या हयातीतच आपल्या तीन मुलांमध्ये – प्रा. डॉ. बाळासाहेब, प्रा. युवराज आणि मधल्या भावाला केशव – शेतजमिनीची वाटणी व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली.

एकूण १६.५ एकर जमिनी, घर आणि गावातील इतर मालमत्ता याची वाटणी भावांनी व त्यांच्या पत्नींनी शांतपणे, घरच्या वातावरणात, वडिलांच्या साक्षीने केली. विशेष म्हणजे, दोन्ही नोकरदार भावांनी – प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब व युवराज यांनी शेती करणाऱ्या भावाला मोठा हिस्सा देत ९.५ एकर जमीन त्याच्या वाट्याला दिली. स्वतःकडे केवळ ३-३ एकरच ठेवले.

शेती, आंबराई आणि जबाबदाऱ्या – सर्व केशवच्या नावावर

केशव दहिफळे यांच्याजवळ आलेली ९.५ एकर जमीन पूर्णतः सिंचित, दोन विहिरी व बोअर युक्त आहे. त्यातच भर म्हणजे या भागातील आकर्षक आंबराई हीसुद्धा त्यांच्या वाट्याला आली. इतकेच नव्हे तर केशवच्या मुलांचे शिक्षण आणि लग्नाची जबाबदारीही दोन्ही नोकरदार भावांनी उचलली आहे.

या निर्णयामुळे केशव व त्यांच्या पत्नीचा आनंद शब्दात मावणार नाही असा झाला आहे.

तिन्ही जावांचा सामंजस्यपूर्ण सहभाग

या निर्णयामध्ये केवळ भाऊच नव्हे, तर घरातील महिलांचा – तिन्ही जावा – यांचा देखील हसतमुख सहभाग होता. “आम्ही या कुटुंबात बहिणींसारख्या राहतो. निर्णय घेताना सर्वांचं ऐकून, प्रेमानेच ठरवतो,” असे त्या म्हणाल्या.

गावकऱ्यांकडून स्वागत – “ही आमच्यासाठी शिकवण”

खादगावसारख्या अडीच हजार लोकवस्तीच्या गावात एवढ्या मोठ्या शेतवाटणीचा निर्णय विना वाद झाला, हे गावकऱ्यांसाठीही एक सुखद धक्का होता.
“दहिफळे बंधूंनी दाखवलेला मार्ग आम्हीही अवलंबू. ही आमच्या गावाची शान आहे,” असे गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.

न्यायालयीन लढाया थांबवा, प्रेमाने वाटणी करा

दहिफळे कुटुंबाचा निर्णय हे केवळ एक आदर्श उदाहरण नव्हे, तर आज शेतवाटणीवरून भांडत असलेल्या हजारो कुटुंबांसाठी एक सशक्त संदेश आहे – “नातं ठेवा, शेती पुन्हा मिळेल; पण नातं तुटलं तर काहीच उरत नाही!”


✦ ही कथा आहे प्रेम, त्याग, सामंजस्य आणि आईवडिलांचा मान राखणाऱ्या तीन भावांची… जी प्रत्येक घरासाठी एक प्रेरणा ठरावी इतकीच मोठी आहे! ✦


 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button