Nitin Gadkari | आता एकाच झाडाला वांगी-टोमॅटो किंवा बटाटे-टोमॅटो असे दोन पीक घेता येणार..? नितीन गडकरी काय म्हणाले पाहा…

नागपूर (प्रतिनिधी): कृत्रिम बुद्धिमत्ता (‘AI’) तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी लाभदायक असून शेतकऱ्यांचे आयुष्य बदलू शकते. त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढू शकते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता एकाच झाडाला वांगी- टोमॅटो किंवा बटाटे-टोमॅटो असे दोन पिक घेणेही शक्य आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन परिसरात झालेल्या पत्रकार परिषदेत गडकरी म्हणाले, १६ वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्यांवर उपाय करण्याच्या दृष्टीने ॲग्रोव्हिजनची संकल्पना पुढे आली. यावेळी कृषी क्षेत्राशी संबंधित लोकांना एकत्र आणून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी चांगले बीज-कलम विकसित करून संशोधनाच्या जोरावर उत्पादन वाढवण्यासाठी उपाय करण्याचे निश्चित केले.
त्यात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याचेही आवाहन होते. आता एआय तंत्रज्ञानाच्या जोरावर शेत परिसरात सेंसर आणि सॅटेलाईटद्वारे छायाचित्रांचा अभ्यास करून चार दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांना पिकांवर कोणता आजार येणार, हे कळणे शक्य झाले आहे. त्यामुळे या रोगावर आवश्यक कीटकनाशक फवारणीसह उपाय करून गरजेनुसारच पिकांना पाणी देता येते. त्यामुळे निम्मे पाणी व खतांचीही बचत होते.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. हे तंत्रज्ञान संत्रा, ऊससह इतरही सगळ्याच पिकांसाठी वरदान आहे. या तंत्रज्ञानातून संत्रा उत्पादन एकरी २५ टनांपर्यंत वाढण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला. पत्रकार परिषदेला कृषी क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ उपस्थित होते. सगळ्यांनी विदर्भात एआय तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी संजीवनी ठरू शकते, असे मत व्यक्त केले.
मायक्रोसाॅफ्ट, गुगलची मदत
‘एआय’ तंत्रज्ञानासाठी आता मायक्रोसाॅफ्ट आणि गुगल या जागतिक कंपन्याही मदत करत आहे. शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानासाठी खूप खर्चाची गरज नाही. अर्धा एकर शेती असलेला शेतकरीही ३० ते ४० शेतकऱ्यांचा गट करून या तंत्रज्ञानाचा सहज वापर करू शकतात. त्यामुळे एकरी ५ हजार रुपयांचा उत्पादन खर्च असलेल्या शेतकऱ्याला एकीकडे पाणी, खत आणि इतरही बचतीतून उत्पादन खर्च दीड हजारांनी कमी होऊन उत्पादन मात्र ४० ते ५० टक्यांनी वाढणे शक्य आहे. देशात पाण्याची कमी नाही. आपल्याकडे एकीकडे गोदावरीच् १,३०० टीएमसी पाणी समुद्रात जाऊन मिळते. दुसरीकडे नर्मदा नदीचेही पाणी समुद्रात जाते. योग्य नियोजन केल्यास देशात पाण्याची कमी राहणार नसल्याचा दावाही गडकरी यांनी केला.



