सुभाषबापू, विजय देशमुख, कल्याणशेट्टी आणि कोठे मिशन मोडवर
सोलापुरी भाजपाच्या आमदारांच्या विकासाचा चौकार

सुभाषबापू, विजय देशमुख, कल्याणशेट्टी आणि कोठे मिशन मोडवर

सोलापुरी भाजपाच्या आमदारांच्या विकासाचा चौकार

सोलापूर — कोण म्हणतंय भाजपाच्या लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती नाही. लोक पुन्हा पुन्हा निवडून देतात, याचे कारण त्यांचा विकास दृष्टिकोन. भले मंत्री होऊ शकले नाहीत. आजचा दिवस सोलापूरच्या चारही आमदारांसाठी लक्षवेधी ठरला. आ. सुभाषबापू, आ.विजय देशमुख, आ.सचिन कल्याणशेट्टी आणि आ.देवेंद्र कोठे यांचे मिशन….त्यांना मौका मिळाला, त्यांनी विकासाचा चौका लगावला.

मंद्रुप एमआयडीसी, महात्मा बसवेश्वर स्मारक, सोलापूरचे जुने बसस्थानक आणि अक्कलकोट रोड एमआयडीसीबाबत व अक्कलकोट तालुक्यातील वीज पुरवठाविषयी या चारही आमदारांनी पाठपुरावा केला, त्याचे फलित म्हणजे सरकारकडून घेतलेली तातडीने दखल.

मंद्रुप एमआयडीसी तसा जुना विषय. मंद्रुपकरांनीच विरोध केल्यामुळे तो रखडला. पण आ. सुभाष देशमुख पहिल्या दिवसापासून म्हणत होते. उद्योग आले तर रोजगार, बाजारपेठ आणि आर्थिक विकास. तिसर्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा या विषयाला हात घातला. आज उद्योगमंत्री कार्यालयात बैठक झाली. भूसंपादनासाठी शेतकर्यांना पाच पट दर हवे होते. याबाबत सकारात्मक पाऊल उचलले गेले. होटगी येथे लॉजिस्टीक पार्कची उभारणी, चिंचोळी एमआयडीसीत मूलभूत सोयी आणि तीर्थक्षेत्र हत्तरसंग कुडलला पुस्तकांचे गाव करण्यााचा संकल्प सुभाषबापूंनी केला आहे.

सोलापूरचे बसस्थानक येथे प्रायव्हेट पब्लीक पार्टनरशिपवर अत्याधुनिक बसपोर्टची उभारणीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमवेत बैठक पार पडली. तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर येथे जा ये करण्यासाठी सोलापूर हे मध्यवर्ती असून प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता 99 वर्षापूर्वीचे बसस्थानक अपुरे पडतेय, तिथे अत्याधुनिक बसपोर्ट उभारणीबाबतची वस्तुस्थिती आ. विजय देशमुख यांनी मांडली. तसेच विधानसभेत त्यांनी मंगळवेढा येथील नियोजित म.बसवेश्वर स्मारकाची उभारणी आणि समिती याविषयी लक्ष्यवेधी घेतली. आपण पालकमंत्री म्हणून या स्मारकासाठी निधीची तरतूद केली. त्यानंतर हालचाल नाही. विद्यमान पालकमंत्र्यांनी लक्ष घालून म. बसवेश्वर यांचे नियोजित स्मारक उभारणीस गती द्यावी, अशी आग्रही भूमिका आ.विजय देशमुख यांनी घेत लक्ष वेधून घेतले.
आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यातील शेती वीजसंबंधी सरकारचे लक्ष वेधले. महावितरण आपल्या दारी योजनेत सेवासुविधा पुरवल्या जात नाहीत. सौर कृषी पंप योजना, वीज जोडणी, मैंदर्गी, दुधनीत कमी दाबाने वीज पुरवठा, प्रधानमंत्री सूर्यघर योजना असे शेतीविषयक जिव्हाळ्याचे मुद्दे उपस्थित केले. यंदाच्या उन्हाळ्याची तीव्रता, पाणी टंचाई आणि शेतीसाठी पाण्याची निकड याविषयी आ. कल्याणशेट्टी यांनी निर्णायक भूमिका पार पाडून पाणीदार आमदार कसा हे दाखवून दिले.
सोलापूरचे आणखी एक दमदार आमदार देवेंद्र कोठे यांनीही एमआयडीसीच्या दुरवस्थेबाबत उद्योग सचिव अनबलगन आणि उद्योजकांसमवेत बैठक़ घेतली. सर्वाधिक कर भरून देखील मूलभूत सुविधा उद्योजकांना मिळत नाहीत. रस्त्यांंची दुरवस्थेकडे लक्ष वेधले. विशेष म्हणजे होटगी रोड औद्योगिक वसाहत आणि अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील उद्योजकांना दुहेरी कराचा फटका बसतो. त्यामानाने सुविधा महापालिकेकडून पुरविल्या जात नाहीत. अशा स्थितीत चालू उद्योग बंद पडण्याची भीती आहे. त्यामुळे तातडीने प्रस्ताव मागवून कार्यवाहीबाबत उद्योग सचिव अनबलगन यांनी आश्वासित केले.