तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव, 40 हजार लोकसंख्येकरिता केवळ 4 स्वच्छतागृहे
तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरातील स्वच्छतागृहांचा अभाव
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230820-WA0066-538x470.jpg)
तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव,
40 हजार लोकसंख्येकरिता केवळ 4 स्वच्छतागृहे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट, दि.20 : साहेब, आपण करता तरी काय? तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरातील स्वच्छतागृहांचा अभाव तरी आहेच, आहे ते अस्वच्छ, घाणींचे साम्राज्य, दुर्गंधी यामुळे रोगराई पसरली जात आहे. याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याबाबत स्वामीभक्त व शहरवासियांतून टीकेची झोड उठत आहे.
अक्कलकोट शहरात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणारी तरंगती लोकसंख्या व शहराची लोकसंख्या पाहता त्याप्रमाणे अद्यापही विकास म्हणावा तसा होत नसल्याने अनेक जुने स्वच्छतागृहेच वापरले जात आहेत. यामध्ये जुने तहसिल कार्यालयाजवळील टेकडी येथील स्वच्छता गृहासह वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, ए-वन चौक, कारंजा चौक, सेंट्रल चौक एवढ्या मोजक्याच ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहात प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मुतार्यामध्ये शौचालयाचा वापर केला जात आहे. या मुतार्यामध्ये आवश्यकत त्या सोयी सुविधांचा अभाव आहे. माणसी 10 हजार लोकसंख्येच्या पाठीमागे 1 मुतारी पाहता, 40 हजार लोकसंख्या असलेल्या शहराला 4 स्वच्छतागृहे आहेत, ते ही अस्वच्छतेने माकलेले आहेत. हे पाहून शहरवासिय व स्वामीभक्त, मुख्याधिकारी करतात तरी काय? असा सवाल व्यक्त होत आहे.
प्रशासक असल्यामुळे नगरसेवकांचा त्रास तर उरलाच नाही. एक जबाबदार प्रशासक म्हणून मुख्याधिकार्यांनी स्वामीभक्त व शहरवासियांना मुख्याधिकार्यांकडून दिलासात्मक कामे होणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षातील विकास निधीचा ओघ पाहता शहराचा चौफेर विकास होणे गरजेचे होते. विकास होऊ नये याकरिता प्रशासकीय बाबीची पुर्तता करण्यास विलंब करणारेच पालिका प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी हे झारीतील शुक्राचार्यच्या भूमिकेत आहेत. त्यांना संबंधित टेबलवरुन हकालपट्टी करण्याची मागणी पुढे येत आहे. शतकपूर्ण केलेली नगरपालिका आजही विकासापासून कोसो दूर राहिलेली आहे.
पालखी मार्गावर केवळ तीनच स्वच्छतागृहे आहेत. ही अत्यंत खेदाची बाब आहे. बसस्थानक व समाधी मठ परिसर, कांदा बाजार, लक्ष्मी मंडई, राजे फत्तेसिंह चौक, श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर व अन्नछत्र मंडळ परिसर सुलभ शौचालय बांधण्यात आले. अद्याप ते सेवेत आलेले नाहीत. महिलांकरिता स्वच्छतागृहांचा अभाव असून नगरपरिषदेने फिरते स्वच्छतागृह लाखो रुपये खर्च करुन घेण्यात आले. मात्र ती नगरपरिषदेच्या जुन्या दवाखान्यातच धुळ खात पडून आहेत.
अनेक ठिकाणी नगरपरिषदेकडून विविध विकास कामे करण्यात आली. आरक्षण टाकण्यात आलेले असून ते देखील विकसित होणे गरजेचे आहे. वटवृक्ष मंदिराशेजारील धर्मशाळा गेल्या अनेक वर्षापासून पडून असून विविध ठिकाणची विकास कामे घेत असताना या धर्मशाळेचा विसर मात्र नगरपरिषदेला पडत आहे. या बरोबरच सेंट्रल स्कूल (हेरिटेज शाळा) पिंपळाच्या झाडानी वेढलेले आहे. त्या भागातील लोकांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केले असताना देखील नगरपरिषदेने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. याबरोबरच डुकरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढलेला असल्यामुळ याचा देखील अस्वच्छतेमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत आहेत. नुकताच कोट्यावधी रुपयेचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झालेला आहे. याकरिता नगरपरिषदेने विकासाची कार्यशाळा घेण्याची मागणी देखील पुढे येत आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)