डॉ. रमेश पानसे यांना पु. ग. वैद्य कार्यगौरव पुरस्कार जाहीर
7 जून रोजी गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते वितरण
पुणे : बाल साहित्यातील मातृ संस्था असलेल्या आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत असलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संर्स्थेतर्फे देण्यात येणारा पु.ग. वैद्य कार्यगौरव पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ ग्राममंगलचे संस्थापक डॉ. रमेश पानसे यांना जाहीर झाला आहे.
येत्या 7 जून रोजी सायंकाळी 6 वाजता पत्रकार भवनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी संमेलनाध्यक्ष व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक भारत सासणे असणार आहेत. तर पु. ग. वैद्य यांच्या पत्नी वसुंधरा वैद्य यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू व कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी दिली.
पु. ग. वैद्य यांच्या नावाने दिला जाणारा हा पहिला ‘कार्यगौरव पुरस्कार’ आहे.
मराठी बालसाहित्यकार अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ आणि त्यांचे सहकारी भा. रा. भागवत, सुधाकर प्रभू, श्यामला शिरोळकर, श्रीधर राजगुरू, लीला दीक्षित इत्यादींनी ऑगस्ट 1975 मध्ये ‘अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे’ या संस्थेची स्थापना केली. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन, राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार, बालसाहित्य व इतर क्षेत्रांत मुलांसाठी भरीव कार्य करत असलेल्या व्यक्तीस जीवनगौरव पुरस्कार, मुलांना वाचनाची गोडी लावणे, मुलांसाठी व प्रौढांसाठी बालसाहित्य लेखन कार्यशाळा घेणे, मुलांमध्ये भाषा व साहित्याची आवड निर्माण करणे, उत्तम व सकस बालसाहित्याची निर्मिती करून ते अल्प किंमतीत वितरित करणे अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांचे जतन व संवर्धन करण्याचे काम ही संस्था गेली 50 वर्षे करत आहे.
चौकट
जीवनगौरवचे यंदापासून नाव बदलले
ऑगस्ट, 2024 पासून संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. या आधी जीवनगौरव या नावाने दिल्या जाणार्या पुरस्काराचे नाव या वर्षापासून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ ‘पु. ग. वैद्य कार्यगौरव पुरस्कार’ असे करण्यात आले आहे. पु. ग. वैद्य हे ‘बालकुमार साहित्य संस्थे’चे अनेक वर्षे अध्यक्ष होते. धडपड व्यासपीठ, आचार्यकूल, पालक शिक्षक संघ, पुणे मनपा शिक्षण मंडळ, बालकुमार साहित्य संस्था, ज्ञानदा प्रतिष्ठान, ज्ञानेश्वर विद्यापीठ, किशोरमित्र (मासिक), महाराष्ट्र राज्य गणित महामंडळ अशा कितीतरी संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे.