पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणार – सिकंदर शेख
पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणार - सिकंदर शेख

मुंबई : महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत पै. महेंद्र गायकवाड आणि पै. सिकंदर शेख यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यावेळी मारुती सातव पंच होते. या सामन्यात झालेल्या पराभवामुळे पै. सिकंदर शेख याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर पंच मारुती सातव यांना धमकीचे फोन आल्याची चर्चा आहे, मात्र खुद्द सिकंदर शेखने ही धमकी नसून फक्त विचारणा केली असल्याचे म्हटले आहे. तसेच माझ्यावर अन्याय झाला असल्याचे देखील सिकंदर शेखने म्हटले.

दरम्यान, पंचाना दिलेल्या धमकीवरून सिकंदर शेखने स्पष्टीकरण दिले आहे. सिकंदर शेखने म्हटले, “जिथे टांग लागली तिथे परफेक्ट टांग लागली नव्हती, पण त्याची (महेंद्र गायकवाड) अॅक्शन होती म्हणून त्याला 2 गुण द्यायला पाहिजे होते. तसेच माझी पूर्णपणे पकड होती म्हणून मला 1 गुण द्यायला हवा होता. अशी 4-3 ने कुस्ती चालायला हवी होती. तिथे 2 गुण द्यायला हवे होते तिथे 4 गुण देण्यात आले. वरून पूर्णपणे खाली पडल्यावर 4 गुण दिले जातात पण तसे झाले नाही. माझ्या प्रशिक्षकांना दाद मागितली पण त्यांना तिथून हाकलून दिले. मी पूर्णपणे तयारी केली होती त्यामुळे मी महाराष्ट्र केसरी झालो असतो. पण तसे झाले नाही हे सर्व थांबले पाहिजे.”

तसेच पुढच्या वर्षी कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची गदा आणणार असल्याचेही सिंकदर शेखने म्हटले. “मागील खूप दिवसांपासून आमची तालीम महाराष्ट्र केसरीची गदाची वाट पाहत आहे. मी नक्कीच पुढच्या वर्षी कोल्हापूरात महाराष्ट्र केसरीची गदा आणेन. पंच मारूती सातव यांना धमकी नसून फक्त विचारणा केली आहे. तसेच संग्राम कांबळींनी फक्त प्रश्न विचारला असे सिकंदरने ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
