संत चोखामेळा साहित्य संमेलन म्हणजे परिवर्तनवादी विचारांच्या वारकऱ्यांची मांदियाळी – संजय सोनवणी
संत चोखामेळा साहित्य संमेलन २०२४

संत चोखामेळा साहित्य संमेलन म्हणजे परिवर्तनवादी विचारांच्या वारकऱ्यांची मांदियाळी – संजय सोनवणी
पुणे – संत चोखामेळा अध्यासन केंद्र, वृंदावन फाऊंडेशन, पुणे आणि विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान, पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 28 व रविवार 29 सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र पैठण येथे होणाऱ्या दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलन 2024 च्या फलकाचे (पोस्टरचे) अनावरण ज्येष्ठ इतिहास संशोधक अभ्यासक , साहित्यिक संजय सोनवणी यांच्या शुभहस्ते शिवनगरी कोथरूड येथे करण्यात आले , याप्रसंगी संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील , संत चोखामेळा महाराज वंशज , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम सर्वगोड उपस्थित होते .

पंढरपूरला येणारा प्रत्येक वारकरी ,निर्मोही भावाने इथे येत असतो , वारकरी संप्रदाय हा जगाला बंधुभाव आणि एकतेचा मार्ग दाखवत असून येथे कुठल्याही प्रकारचे भेदाभेद असत नाहीत. ही समतेच्या विचारांची भूमी आहे इथे जात धर्म पंथ याला अजिबात महत्त्व नसतेच , म्हणूनच तर येथे लहान थोर एकमेकांना माऊली म्हणत एकमेकांच्या चरणीं विनम्र भावाने नतमस्तक होतांना दिसतात . संत चोखामेळा ,संत नामदेव या गुरू शिष्याचे दर्शन घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरणीं नतमस्तक होत , माणसाची दुभंगत चाललेली मन जोडण्याचा संवाद सुरू झाला …. !

या रे या रे लहान थोर l
याती भलते नारी नर
करावा विचार l
न लगे चिंता कोणाशी ll

कोणीही या, लहान या, थोर या, स्त्री या, पुरुष या, आबाल या, वृद्ध या, कोणीही या आणि या समतेच्या भक्तिरसामध्ये सगळे डुंबून जा, असं साधं सोपं तत्त्वज्ञान सर्वच वारकरी संतांनी सांगितलेलं आहे.
या अभंगाकडे तुम्ही बारकाईने पाहिलंत तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवेल की इथे वर सांगितल्या प्रमाणे कुठलेही भेदाभेद तर नाहीतच उलट
‘या रे या रे लहानथोर’ अस सांगताना देखील पहिल्यांदा त्यांनी लहानांना बोलावले आहे व नंतर थोर म्हणजे मोठयाना . असा समतेचा व्यवहार इथे पूर्वापार चालत आलाय . समाज व्यवस्थेत जो वंचित-शोषित आहे,शेवटच्या रांगेतील आहे. त्याला पहिल्यांदा बोलावले आहे आणि नंतर थोर.
‘याती भलते नारी नर’.. याती म्हणजे जाती. वेगवेगळ्या जातीवरून भलते म्हणजे कुणीही. पहिल्यांदा नारी, नंतर नर. स्त्री पुरुष समानतेचा ,स्त्रियांच्या न्याय हक्काचा विचार आज आपण आग्रहाने मांडतो आहोत. वारकरी संप्रदायात मात्र सातशे वर्षांपासूनच किंवा त्याही आधी पासूनच स्त्रीयांना पहिलं स्थान दिलेल आहे . तिथे अग्रक्रमाने स्त्री समानता जपली जाते. हे वरील ओळीतुन आपल्या निदर्शनास आल्याशिवाय राहत नाही. पैठणच्या नाथ भूमीत महान संत चोखामेळा साहित्य संमेलन म्हणजे परिवर्तनवादी विचारांच्या वारकऱ्यांची मांदियाळी जमणार असून , वारकरी विचारांच मंथन होइल . या संमेलन निमित्ताने संत चोखोबांची तरुण पिढीला नव्याने ओळख होइल असेही पुढे बोलतांना सोनवणी यांनी सांगितले .

दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन 2024 च्या
बोधचिन्हांचे अनावरण देवशयनी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी धाराशिव शहरातील संत मुक्ताबाई मंदिरात
संत मुक्ताबाई यांच्या परम भक्त, अभ्यासक व त्यांच्या विचार कार्याच्या प्रसारक मंगलताई वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.

“सोयराबाई : संत, कवी आणि माणूस” असा मध्यवर्ती आशय घेऊन संपन्न होत असलेले दोन दिवसीय साहित्य संमेलन एकूण सहा सत्रात विभागून होणार असून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नामवंतांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र पैठण येथे शनिवार 28 व रविवार 29 सप्टेंबरला संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनात परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलन, संत साहित्य प्रदर्शन, उद्बबोधन व संत साहित्याचे देखावे असणार आहेत. सदरील संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून संत सोयराबाई यांच्या साहित्याचे अभ्यासक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे असणार आहेत.
दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संजय सोनवणी यांनी शुभेच्छा दिल्या .