
*कै कल्याणराव इंगळे महाविद्यालयात मतदान जनजागृती व सत्कार सोहळा संपन्न*
कै.कल्याणराव ( बाळासाहेब) इंगळे तंत्रनिकेतन मध्ये मतदान जनजागृती व नूतन उपजिल्हाधिकारी श्री सुनील टाकळे व महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री शुभम नारायणकर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन श्री महेश इंगळे हे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोटचे अपर तहसीलदार श्री श्रीकांत कांबळे हे उपस्थित होते. सुरुवातीला प्राचार्य एन बी जेऊरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी श्री महेश इंगळे यांच्या शुभहस्ते अक्कलकोट तालुक्याचे सुपुत्र श्री सुनील टाकळे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्रातून आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवल्याबद्दल शाल, श्रीफळ, स्वामीप्रसाद देऊन गौरवण्यात आले तसेच महाविद्यालयाचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणाऱ्या व सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता या पदासाठी निवड झालेल्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री शुभम चंद्रकांत नारायणकर याला सुद्धा यथोचित सत्कार करून गौरविण्यात आले.
यावेळी अप्पर तहसीलदार श्री श्रीकांत कांबळे यांनी मतदान प्रक्रियेमध्ये आवर्जून सहभाग नोंदवून लोकशाही बळकट व सुदृढ बनवण्याचे आवाहन केले. त्यानंतर श्री नारायणकर व सुनील टाकळे यांनी मनोगत मांडले.
यावेळी नारायण यांनी हे तंत्रनिकेतन माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी एक अमूल्य वरदान ठरले असल्याचे सांगितले आणि त्यांनी आपल्या शिक्षकाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना श्री सुनील टाकळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, अभ्यासात सातत्य व तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केल्यास स्पर्धा परीक्षेत नक्की यश मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खूप क्षमता असते व क्षमतेचा अभ्यासामध्ये वापर करून यश मिळवावे व आपल्या पदाचा वापर जनसेवेसाठी करावे असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात श्री महेश इंगळे यांनी सत्कार मूर्तींचे परिश्रम व संघर्ष वाखाणण्याजोगे आहे असे गौरवो उद्गार काढून त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी अशा यशस्वी व्यक्तींकडून प्रेरणा व मार्गदर्शन घेऊन आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवाहन केले तसेच मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. यावेळी प्रशासनाच्या आवाहनास साथ देत सुमारे 50 विद्यार्थ्यांनी नव मतदार म्हणून नोंदणी केली. यावेळी प्राचार्य एन व्ही जेऊरे, उपप्राचार्य व्ही डी पवार, शैक्षणिक समन्वयक श्री अमोल भावठाणकर, विभाग प्रमुख श्री वैजनाथ खिलारी, विभाग प्रमुख श्री धीरज जनगोंडा, विभाग प्रमुख श्री मल्लू माने यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी शिवानी भोसले हिने केले तर आभार उपप्राचार्य श्री व्ही डी पवार यांनी मानले.
