डेंग्यु , हिवताप व चिकनगुनिया यांसारख्या किटकजन्य रोगांची साथी उद्भवू नये यासाठी नागरिकांनी ही काळजी घ्यावी ; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आवाहन
निगडी (प्रतिनिधी) : दि.१७, डेंग्यु , हिवताप व चिकनगुनिया यांसारख्या किटकजन्य रोगांची साथी उद्भवू नये यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे.

हिवताप हा आजार एनॉफिलस व डेंग्यु, चिकुनगुनिया हे आजार पसरवण्यास एडिस इजिप्ताय हे डास कारणीभुत असतात. हिवताप, डेंग्यु किंवा चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीस डास चावला तर रोग्याच्या रक्तातील हिवताप/ डेंग्यु/ चिकनगुनियाचे विषाणु त्या डासाच्या शरीरात शिरतात असा विषाणुजन्य डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्याला हिवताप/ डेंग्यु/ चिकनगुनिया होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हिवताप /डेंग्यु / चिकनगुनिया रोगाचा प्रसार थांबवायचा असल्यास एनॉफिलस व एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालणे आवश्यक आहे.

डासाची मादी घरात साठलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालते. या अंडयातुन बाहेर पडणा-या डासांच्या अळया त्याच पाण्यात वाढतात. 4-5 दिवसानंतर या अळयांचे कोष बनतात व हे कोषही पाण्यातच जिवंत राहतात. कोषातुन 2 दिवसांनी डास बाहेर पडतात. डासांच्या अंडयापासुन त्याचा डास होण्यास 08-10 दिवसांचा कालावधी लागतो म्हणुन जर आपण दर आठवडयास साठलेले पाणी एकदा पुर्णपणे वापरुन ड्रम कोरडा केला, सुकवुन नंतर परत भरला तर त्या पाण्यात असलेल्या अंडी/अळया मारल्या जातील व डासांच्या उत्पत्तीस आळा बसेल.

आपल्या घरातील पाण्याचे काही साठे असे पुर्णपणे रिकामे करता येणे शक्य नसते. घरावर असलेली पाण्याची टाकी किंवा तळघरात असलेली पाण्याची टाकी अशा ठिकाणी डासांनी अंडीच घालु नयेत म्हणुन या टाक्या पुर्णपणे झाकण टाकुन बंद ठेवाव्यात म्हणजे डास टाकीत शिरु शकणार नाहीत. घरामध्ये फ्लॉवर पॉट, कुलर, फ्रिजचा खालचा ट्रे अशा ठिकाणी पाणी साठलेले असते. दर आठवडयास या वस्तुतील पाणी बदलले गेले नाही, तर डासांना अंडी घालण्यास उत्तम जागा मिळते. डेंग्यु/ चिकनगुनिया या रोगाचा प्रसार वाढु नये म्हणुन डास उत्पत्तीवर नियंत्रण महत्वाचे असुन यासाठी फक्त एवढेच करावयाचे आहे.

